शिरपूर, अंकलेश्वर ब्रहानपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर ते शहादा दरम्यानच्या अत्यंत खराब रस्त्यांच्या विरोधात ‘शिरपूर फर्स्ट’ या संघटनेने आज वाघाडी येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, वारंवार निवेदने देऊन आणि विविध संघटनांनी आंदोलने करूनही दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोट्यवधींच्या निधीचा विनियोग कुठे?
आंदोलकांनी सांगितले की, २०२३ मध्ये या महामार्गासाठी ६३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला होता. याव्यतिरिक्त, मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध होत असतानाही, अद्याप काम सुरू झालेले नाही. “कोट्यवधी रुपयांचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
अनोखे निषेध आणि तीव्र इशारा:
आंदोलनादरम्यान, खड्ड्यांमध्ये ५०० रुपयांच्या नोटा ठेवून आणि वटपौर्णिमेनिमित्त वडाचे वृक्ष खड्ड्यात लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत, ‘शिरपूर फर्स्ट’च्या कार्यकर्त्यांनी “NHAI चे अधिकारी अजून किती बळींची वाट बघत आहेत?” असा आक्रमक प्रश्न विचारला.NHAI ला १० दिवसांचे अल्टिमेटम:’शिरपूर फर्स्ट’ आणि ग्रामस्थांनी NHAI ला गंभीर इशारा दिला आहे. जर येत्या दहा दिवसांत महामार्गाचे दुरुस्तीकरण काम सुरू झाले नाही, तर NHAI धुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांची खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याने ‘आंघोळ’ करण्यात येईल, असा संतप्त इशारा वाघाडी येथील रास्ता रोको आंदोलनादरम्यान देण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















