शिरपूर (प्रतिनिधी) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २२ एप्रिल) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उभ्या असलेल्या खाजगी प्रवासी वाहनाला मागून भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली.
या भीषण अपघातात मनीषा राजेंद्र पाटील (वय ४६, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) आणि बंटी किशन जाधव (वय ३२, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी प्रचंड होती की वाहनाचा चक्काचूर झाला आणि दोघांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहून हिसाळे गावाकडे जाणारे प्रवासी वाहन महामार्गावरील हॉटेल आरतीसमोर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या डी.डी. ०१ जी ९७५२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने या वाहनाला जबर धडक दिली.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बस्सी यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मृत मनीषा पाटील या लग्नकार्याच्या निमित्ताने हिसाळे येथे आल्या होत्या. तब्येत बिघडल्याने उपचारासाठी शिरपूरला जाऊन परत येत असतानाच हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. त्या नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या भगिनी असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















